आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा मोबाईल हरवला आणि तो पुन्हा सापडलाच नाही. हा अनुभव आता आपल्या सर्वांसाठी काही नवा नाही. पण यावर आता केंद्र सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. यावर जागतिक दूरसंचार दिनानिमित्त म्हणजे 17 मे रोजी सरकार मोबाईल ब्लॉकिंग आणि ट्रॅकिंग सिस्टम सुरू करणार आहे.
केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव अधिकृतपणे संचार साथी पोर्टल (CEIR) लाँच करणार आहेत. याद्वारे लोक चोरीला गेलेले किंवा हरवलेले फोन ब्लॉक आणि ट्रॅक करू शकतील. सेंटर फॉर डिपार्टमेंट ऑफ टेलीमॅटिक्स (C-DOT) सध्या दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि ईशान्य प्रदेशातील काही दूरसंचार कार्यालयांमध्ये या प्रणालीचा एक पायलट प्रकल्प चालवत आहे. हा प्रकल्प आता संपूर्ण भारतात आणण्यासाठी तयार आहे.
#WorldTelecomDay2023| On the occasion of World Telecom Day i.e. May 17, @DoT_India is launching a citizen centric 'Sanchar Saathi' portal.#WTD2023 #SancharSaathi #DIU #TAFCOP #CEIR
Follow this space for more information. pic.twitter.com/dKVDh1EpM6
— DoT India (@DoT_India) May 12, 2023
आयएमईआय नंबर बदलल्यानंतरही फोन ट्रॅक
सध्या मोबाईल चोरी झाल्यानंतर देखील तो आयएमईआय क्रमांकाच्याद्वारे शोधला जाऊ शकतो. पण चोर मोबाइल चोरल्यानंतर डिव्हाइसचा आयएमईआय (IMEI) क्रमांक बदलतात. त्यामुळे मोबाइल ट्रॅक किंवा ब्लॉक करता येत नाही. पण या नव्या ट्रॅकिंग सिस्टीममुळे IMEI नंबर बदलल्यानंतरही डिव्हाइस ट्रॅक आणि ब्लॉक करण्यास सक्षम असेल.
आतापर्यंत 8 हजार फोन जप्त
या पोर्टलद्वारे आतापर्यंत 4.70 लाख हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल ब्लॉक करण्यात आले आहेत. यासोबतच 2.40 लाखांहून अधिक मोबाईल ट्रॅक करण्यात आले आहेत. तर पोर्टलच्या मदतीने 8 हजार फोनही जप्त करण्यात आले आहेत. अलीकडेच, कर्नाटक पोलिसांनी पोर्टलच्या मदतीने 2500 हून अधिक हरवलेले मोबाईल परत मिळवून मालकाच्या ताब्यात दिले आहेत.