यंदाच्या वर्षातील पहिले वादळ कालपासून (दि. ८ मे) बंगालच्या उपसागरात तयार होत आहे. आज त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. ते वादळ उद्या म्यानमारच्या दिशेने पुढे सरकून तिकडेच जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे. कालपासून राज्यात वारा आणि मेघर्गजनेसह पावसाचे वातावरण तयार झाल्यामुळे चक्रीवादळाचा राज्यावर देखील परिणाम होणार असल्याची चर्चा होते आहे.
पण राज्याला या चक्रीवादळाचा धोका नाही, असे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. 'मोचा' नावाचे हे यंदाच्या वर्षातील पहिलेच चक्रीवादळ असणार आहे.
राज्याची काय परिस्थिती ?
या चक्रीवादळामुळे वारा खंडित प्रणालीमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, वाशिम, यवतमाळ येथे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. या प्रणालीचा प्रभाव कोल्हापूर, सातारा, सांगली येथे मंगळवारीही जाणवण्याची शक्यता आहे. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेला हा यलो अॅलर्ट हा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दिलेला इशारा असे समजून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
९ मे, सकाळी ९ वा., द.कोकण, #रत्नागिरी, #सिंधुदुर्ग, #रायगड, #सातारा, #सांगली #कोल्हापूर व संलग्न #मराठवाडा व #विदर्भ भागात, #गोवा, ढगाळ आकाश...पुढच्या 2,3 तासात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता. #पुणे पण ढगाळ.
Watch for alerts from IMD pl. pic.twitter.com/eQUhM6rAuf
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 9, 2023
या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाच्या हवामान संशोधन आणि सेवा विभाग पुण्याचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी, राज्याला चक्रीवादळाचा धोका नसल्याचे स्पष्ट केले. ‘हे चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनाऱ्यापासूनही दूर सरकत आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही’, असे ते म्हणाले. चक्रीवादळासंदर्भातील अद्ययावत माहिती हवामान विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात येत आहे. ती पाहण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
असा असेल चक्रीवादळाचा प्रवास
दि. ८ मे रोजी सकाळी ८.३० वाजता दक्षिण अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले.
दि. ९ मे रोजी याची तीव्रता वाढण्याच अंदाज.
दि १० मे रोजी बंगालच्या उपसागरात आग्नेयेकडे आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात आणि अंदमानच्या समुद्रात ही प्रणाली चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता.
दि ११ मे हे चक्रीवादळ उत्तर आणि वायव्येकडे प्रवास करेल.
त्यानंतर हे चक्रीवादळ आपला मार्ग हळूहळू बदलून बांग्लादेश आणि म्यानमारच्या किनाऱ्याजवळ ईशान्य दिशेने जाण्याची शक्यता.