गेल्या काही महिन्यापासून गाजत असलेल्या सत्तासंघर्षांवर आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. राज्याचे तत्कालीन राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष यांच्या निर्णयावर ताशेरे ओढले असले तरी न्यायालयाकडून मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांना मात्र दिलासा दिला आहे.
न्यायालयाने नवाब रेबिया प्रकरण मोठ्या बेंचकडे पाठवण्याचा निर्णय दिला असला तरी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय मात्र पुन्हा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे पाठवला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना काही सवाल केले.
यावेळी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांनी "सर्वोच्च न्यायालयाने संपूर्णपणे घटनात्मक ठरवलेल्या सरकारच्या पत्रपरिषदेत मी आपले स्वागत करतो." असं म्हणत न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. शिवाय हा लोकशाहीचा विजय आहे. असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयावर आणि लोकशाहीवर विश्वास असेल तर त्यांना, आजच्या निकालाने त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस@Dev_Fadnavis #DevendraFadnavis #Maharashtra #SupremeCourt #judgement pic.twitter.com/fBtwY6lPdf
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) May 11, 2023
ते पुढे म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे पूर्वस्थिती आणता येणार नाही. हे प्रकरण हस्तक्षेप करण्यासारखे नाही, असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. निवडणूक आयोगाला निर्णयास मुभा देण्यात आली आहे. राजकीय पक्ष कोणता हे ठरविण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहेत, हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे. शिंदे यांना शपथविधी करण्यासाठी निमंत्रित करण्याचा राज्यपालांचा निर्णय योग्य होता, हेही सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.
तेव्हा नैतिकता कुठे गेली होती?
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, उद्धवजी, भाजपसोबत निवडून आलात आणि सरकार स्थापन करताना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले होता, तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? त्यामुळे तुम्ही नैतिकता डोळ्यापुढे ठेवून नाही तर घाबरून राजीनामा दिला, हे मान्य केले पाहिजे. असं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयावर आणि लोकशाहीवर विश्वास असेल तर त्यांना, आजच्या निकालाने त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.