घोषणांमध्ये ‘गतिमान’ आणि प्रत्यक्ष कामात ‘गतिमंद’, सरकार बैलगाडीपेक्षा हळू, सामनातून शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल
राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून टीका
टीम तालुका न्यूज / 07-Jun-2023
राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. गेले जवळपास एक वर्ष झालं. मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या वावड्या उठत आहेत पण प्रत्यक्ष विस्तार मात्र होताना दिसत नाही. याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली आहे.
दैनिक सामना अग्रलेखात लिहिलं की, महाराष्ट्रात गतिमान सरकार आल्याची पुंगी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस वाजवत आहेत. आमचे सरकार हे ‘डबल इंजिन’ असल्याचं ते म्हणतात. पण इंजिनला ‘तेलपाणी करण्यासाठी वारंवार दिल्लीतील सर्व्हिसिंग स्टेशनवर जावे लागते, अशी टीका सामनातून केली. यालाच हे लोक गतिमान सरकार म्हणत असतील तर काय म्हणावे? सत्य हे आहे की तथाकथित गतिमान सरकार बैलगाडीपेक्षा हळू आहे, अशा शब्दात सरकारचा समाचार घेतला.
दिल्लीला हेलपाटे मारून थकले
रखडलेल्या मंत्रिमंडळावर भाष्य करतांना लिहिलं की, वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही आणि विस्तार व्हावा, यासाठी दिल्लीला हेलपाटे मारून मिंधे-फडणवीस थकले आहेत. जे सरकारला वर्षभर मंत्रिमंडळ विस्तार करण्याची वाढवण्याची हिंमत दाखवू शकले नाही, त्यांनी गतिमानतेच्या गोष्टी कराव्यात, याचे आश्चर्य वाटते. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या विस्ताराला 41 दिवस लागले आणि त्या विस्ताराला नऊ महिने उलटले तरी दुसऱ्या विस्ताराचा पाळणा हलायला तयार नाही. कारण सगळा ‘वांझ’ कारभार सुरू आहे. पाळणा इकडे व दोरी हलवणारे दिल्लीत असल्याचे चित्र आहे, अशी टीका केली.
शिवसेनाचा महापौर होण्याची भीती
गेल्या दोनेक वर्षापासून महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईला महापौर नाही. मुंबई शहर महापौराविना उघडीबोडकी आहे. महापालिकेत लोकनियुक्त सरकार नाही. त्यांना हवा तसा कारभारा मंत्रालयातून चालवल्या जात आहे. बरं, महापौर आणि निवडणूक का नाही? तर निवडणुका झाल्या तर शिवसेनेचा महापौर होईल या भीतीने गतीमान सरकारने मुंबईच्या महापौरपदाचा कोंबडा झाकल्याचं अग्रलेखात म्हटलं.
दरम्यान, राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावरूनही सरकारला खडे बोल सुनावले. मिंधे सरकारचा कारभार घोषणांमध्ये ‘गतिमान’ आणि प्रत्यक्ष कृतीत ‘गतिमंद’ असाच सुरू आहे. तुम्ही कोणत्या वेगाने काम करता? मुंबईसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूपदी नियुक्ती करायला एवढा उशीर केला. आता आता मुंबईसह महाराष्ट्रातील इतर पालिकांना महापौर कधी मिळणार, अशी विचारणा सरकारला केली.